रत्नागिरी : येथील तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांची दिल्ली मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांनी २०१७मध्ये कमांडंट एस. एम. सिंग यांच्याकडून येथील तटरक्षक दलाच्या स्टेशन कमांडर पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
रत्नागिरीतील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रलंबित विषय अतिशय नियोजन पद्धतीने हाताळले. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी प्रशासकिय मान्यता मिळवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे आगामी काळात रत्नागिरी हे भारतीय सेना दलाचे विशेषत: तटरक्षक दलाचे एक प्रमुख तळ बनणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत ते तटरक्षक दलाच्या रत्नागिरी विमानतळाचे प्रभारी कमांडंट अतुल दांडेकर यांच्याकडे तटरक्षक दलाच्या स्टेशन कमांडर पदाची सुत्रे सुपूर्द करतील.
अंदमान निकोबार येथील नव्याने उभारलेल्या मायाबंदर या कार्यालयाच्या विकासाचे शिल्पकार असलेल्या कमांडंट पाटील यांनी रत्नागिरीतील प्रलंबित विषयांमध्ये मुख्यत: प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करून घेऊन कार्यालयाचे स्थलांतरण करणे, धावपट्टीचे विस्तार-अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करून तटरक्षक वायू अवस्थान या तटरक्षक दलाच्या स्वतंत्र कार्यालयाच्या उद्घाटनाच्या दृष्टीने सज्ज करणे, धावपट्टी ते पार्किंग हॅंगर अशी विमानांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक सुमारे आठ एकर खाजगी जमिनीचा ताबा घेणे आणि रस्ता व पाइपलाइन यांच्या मार्गबदलासाठी प्रशासकीय मान्यता मिळवून घेणे, जवानांच्या आंतरवास इमारतीचे कार्य पूर्णत्वास आणणे आदी बाबीं पूर्णत्वास नेल्या.
पाटील यांनी हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये किल्ले गावात सुसज्ज जहाज दुरूस्ती केंद्र व आधुनिक जेट्टी, भाट्ये बीचवर अद्ययावत होवरपोर्ट असे तटरक्षक दलाचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या हाताळले असून, ते मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर विचाराधीन आहेत. त्यांनी विशेष प्रयत्नांमधून तटरक्षक दलाच्या जवानांसाठी पायाभूत सुविधा निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून अतिरिक्त १२ एकरांच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मान्यता मिळविली आहे; तसेच त्यांच्या प्रयत्नांतून झाडगाव येथे अधिकारी आणि जवानांसाठी रहिवासी सदनिका बनविण्याच्या कामांनादेखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून आजमितीस सुमारे ४०० कोटी रुपयांची कामे रत्नागिरी तटरक्षक दल हाताळत आहे. याव्यतिरिक्त जहाज दुरूस्ती केंद्रास सुमारे २०० कोटींची आर्थिक तरतूद प्रथम चरणात होणे अपेक्षित आहे.
तटरक्षक दलाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कमांडंट पाटील यांच्या संकल्पानेनुसार अगदी कमी कालावधीत मुख्य संचालन कार्यालय, रडार रूम, सॅटेलाइट ट्रॅकिंग यंत्रणा कक्ष, कॉनफरन्स हॉल, चिकित्सालय, प्रेरणा कक्ष, मिलिटरी कॅंटीन, गार्ड रूम, ग्रीन हाउस उद्यान, ध्वजस्तंभ, प्रेरणा कक्ष आणि वाचनालय यांची अतिशय सुनियोजित पद्धतीने, कुशतेने आणि कलात्मकतेने निर्माण केले गेले आहे. या सोई-सुविधा तटरक्षक दलाच्या दिल्ली मुख्यालयाच्या तसेच इतर सर्व स्तरांच्यादेखील प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत.
या व्यतिरिक्त रत्नागिरी परिसरातील माजी सैनिकांना व त्यांच्या आश्रितांना देश सेवेच्या अपार योगदानंतर मिलिटरी कॅंटीन सुविधेचा लाभ घेताना होणार्या गैरसोईंची दखल घेत कमांडंट पाटील यांनी सुमारे एक वर्षभर तटरक्षक दलाचे मुख्यालये, आर्मी कॅंटीन मुख्यालय नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन तसेच त्यांच्या विविध संस्था यांचेशी नियमित पाठपुरावा करून त्यासंदर्भातले सर्व परवाने, दाखले प्राप्त करून घेतले आणि जानेवारी २०१८मध्ये रत्नागिरी येथील तटरक्षक दलाचे कॅंटीन माजी सैनिकांसाठी खुले केले.
या कार्यकाळात कोकण किनारपट्टीतील समुद्री हालचालींवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यांचादेखील मोलाचा वाटा आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात अनेक संकटकालीन जहाजांना मदत, वैद्यकीय बचाव कार्ये, टोइंग ऑपरेशन, मृत देहांची प्राप्ती, ओखी वादळादरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अडकलेल्या हजारो मच्छिमार जहाजांना मदत अशी कामगिरी केली.
तटीय सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक पावले उचलली. यात मुख्यत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागीदार संस्थांकडून माहितीचे संकलन, त्यानुसार सखोल तटीय नकाशांची निर्मिती आणि त्यांचे सर्व भागीदार संस्थांना पुनर्वितरण यांचा समावेश आहे. स्थानिक मच्छिमारांना सागरी सुरक्षेबद्दल जागरूक करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे यांसाठी या दोन्ही जिल्ह्यांतील किनारी गावांमध्ये हिरीरीने अनेक समुदाय संवाद कार्यक्रमे हाती घेतली. तसेच मच्छिमारांची मुले तटरक्षक दलात भरती होण्यासाठी अनेक किनारी गावांमध्ये जागरूकता अभियानदेखील राबविले.
पाटील यांच्या नेतृत्वामुळे २०१८च्या सुरुवातीस भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीत निर्माण कार्यांबरोबरच गस्ती, शोध व बचाव मोहिमा अतिशय उत्तमरीत्या राबविल्याबद्दल संपूर्ण देशाच्या पश्चिमक्षेत्रातील सर्वोत्तम बेस म्हणून नावाजण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाने रत्नागिरीच्या सर्वाधिक म्हणजेच पाच अधिकार्यांना आणि जवानांना एकाच वर्षी डायरेक्टर जनरल इंडियन कोस्ट गार्ड या मानाच्या पदकाने सन्मानित केले आहे.
रत्नागिरी तटरक्षक दलासाठी दिलेल्या योगदानाव्यतिरिक्त दिल्ली येथील मुख्यालयात त्यांची वर्णी लागल्यामुळे रत्नागिरीच्या सर्व विषयांना मुख्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयातून हाताळताना व त्यांना मार्गी लावताना आता कमांडंट पाटील यांना स्थानिक अनुभवाची साथ असेल. त्यामुळे तटरक्षक रत्नागिरी कार्यालयात समाधानाचे वातावरण आहे.